नवी दिल्ली : भारतीय संघाचे ‘एएफसी’ महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेमधील आव्हान सोमवारी अधिकृतरीत्या संपुष्टात आले.
भारतीय संघातील १२ खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे रविवारी चायनीज तैपेईविरुद्धचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे यजमानांचे सर्व सामने रद्द धरण्यात आले असून कोणताही निकाल ग्राह्य धरला जाणार नसल्याची आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) सोमवारी घोषणा केली. तसेच या स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याने भारताचे २०२३च्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचे स्वप्नही भंगले आहे.
‘‘आशियाई चषक स्पर्धेत भारत आणि चायनीज तैपेई यांच्यातील अ-गटाचा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे ‘एएफसी’च्या नियमांतील ४.१ कलमानुसार, भारताने या संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतल्याचे गृहीत धरण्यात आले आहे. भारताचे सर्व सामने आता रद्द करण्यात आले आहेत,’’ असे ‘एएफसी’च्या पत्रकात म्हटले आहे. भारताला सलामीच्या लढतीत इराणने गोलशून्य बरोबरीत रोखले होते. मात्र, साखळी फेरीअंती अंतिम गुणतालिकेत हा निकाल विचारात घेतला जाणार नाही, असेही ‘एएफसी’ने स्पष्ट केले आहे.
0 Comments