होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन राज्य सरकारने घातलं आहे. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ही नियमावली पाठवण्यात आली असून या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. झाडे तोडणाऱ्यांवर यावेळी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही जाती-धर्मांच्या भावना दुखावतील अशा घोषणा देण्यास व तसे फलक लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान भाजपा आमदार राम कदम यांनी या निर्बंधांवरुन संताप व्यक्त केला असून महाराष्ट्र सरकारचा हिंदू सणांना इतका टोकाचा विरोध का? अशी विचारणा केली आहे. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच असा इशाराही यावेळी त्यांनी दिली आहे.
“महाराष्ट्र सरकारचा एवढा टोकाचा हिंदू सणांना विरोध का? आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत आहो तुम्ही घाबरत असाल.. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात. तुमच्याच भाषेत काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच,” असं राम कदम ट्वीटमध्ये म्हणाले आहेत
0 Comments