मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत सर्वात मोठी बातमी समोर येत असून, सरकारचा तीन कलमी प्रस्ताव मनोज जरांगे पाटलांनी फेटाळला आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय काल रात्री रांजणगाव गणपती येथे आले होते. अडीच तासांनंतर त्यांना जरांगे यांची वेळ मिळाली. त्यानंतर पहाटे चार वाजता चर्चेला सुरुवात झाली. यावेळी दीड तास चर्चा झाली. चर्चेदरम्यान राज्य सरकारचा तीन कलमी प्रस्ताव अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांच्यासमोर ठेवला. परंतु, जरांगे यांनी सरकारचा तीन कलमी प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
जरांगे यांच्या मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार कामाला लागले असून, कोणत्याही परिस्थितीत जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, जरांगे पाटील आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. विभागीय आयुक्त यांच्या शिष्टमंडळाला देखील त्यांनी आपली भूमिका बोलून दाखवली. त्यामुळे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सरकारचे प्रतिनिधी तेथून बाहेर पडले.
0 Comments