news-details
देश-विदेश

अमित शाहांना फोन केल्याचा नारायण राणेंचा दावा खोटा; पोलिसांची न्यायालयात माहिती

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिची मृत्यू पश्चात बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबईतील मालवणी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. ९ तासांच्या चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर नारायण राणे यांनी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला. त्यानंतर सोडण्यात आलं, असं म्हटलं होतं. मात्र आता राणे यांनी खोटा दावा केला असल्याचं आता पोलिसांनी न्यायालयात सांगितलं आहे.

दिंडोशी न्यायालयाने दोघांनाही अटकेपासून दिलासा दिल्यानंतर राणे पितापुत्र जबाब नोंदवण्यासाठी मालवणी पोलिसांसमोर हजर झाले होते. राणे यांनी दिशाची आई वासंती यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अ‍ॅड्. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यात त्यांनी दिशाच्या मृत्यूची खोटी माहिती पसरवल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. तसेच सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन मंजूर करताना पुन्हा गुन्हा केल्यास जामीन रद्द करण्याची अट घातली होती. हा जामीन रद्द करण्यासाठीच आपल्यावर दिशाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचा दावाही नारायण राणे यांनी केला आहे.

पोलिसांनी न्यायालयात काय सांगितले?

“आरोपींना ५ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आरोपी हजर राहिले, मात्र त्यांनी तपासात सहकार्य केलं नाही. आपल्याकडे असलेली माहिती आपण सीबीआयला देऊ अशी खोटी विधानं वारंवार केली. तसेच चौकशी संपल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चौकशी दरम्यान फोन केला होता, असं खोटं विधान केलेलं आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

“आरोपींच्या सदरील बोलण्याचा रोख साक्षीदारांवर आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतो. त्यामुळे तपासात अडथळे निर्माण करीत आहेत. त्यामुळे अटकपूर्व जामीन दिल्यास ते भविष्यात तपासात कोणतंही सहकार्य करणार नाही,” असेही पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनी १९ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी नितेश राणेही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत दोघांनी दिशाच्या मृत्यूबाबत अनेक दावे केले. त्यानंतर दिशाची आई वासंती यांनी तक्रार नोंदवली होती.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments